यशवंतगड

राजापूर तालुक्यात अर्जुना नदी काठी नाटे गावाजवळ यशवंतगड नावाचा किल्ला आहे .मुसाकाजी हे बंदर या किल्ल्यापासून जवळच आहे .या बंदरात उतरणारा माल छोट्या होड्या मधून अर्जुना नदी पात्रातून राजापूर बंदरात जात असे. या व्यापारी मार्गावर लक्नाही.वण्यासाठी यशवंतगड किल्ला बांधण्यात आला होता.
नाटे गावात रस्त्याला लागूनच यशवंतगड किल्ल्याची तटबंदी आणि भगवा झेंडा लावलेला बुरुज दिसतो. किल्ल्याजवळ पोहोचल्यावर ४ फुट रुंद आणि ६ फुट खोल खंदक खणून किल्ला मुख्य जमिनीपासून वेगळा केलेला पाहायला मिळतो. शत्रू थेट किल्ल्याच्या तटाला भिडू नये यासाठी अशाप्रकारचे खंदक खोदले जातात. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी खंदकात उतरुन किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. सर्वप्रथम आपल्याला सिध्द पुरुषाचे मंदिर दिसते . पुढे गेल्यावर खंदकाच्या भिंतीवर कोरलेला हनुमान आणि त्याच्या बाजूला दिवा लावण्यासाठी बनवलेला कोनाडा पाहायला मिळतो. हनुमंताचे दर्शन घेउन पुढे गेल्यावर खंदकात खोदलेली आयताकृती विहीर पाहायला मिळते . विहीरीत उतरण्यासाठी पायऱ्या नाहीत . विहिरीचे पाणी खंदकात न उतरता किल्ल्यात आणण्यासाठी झेंडा लावलेल्या बुरुजावर दोन दगडी खांब लावलेले आहेत. या खांबांवर आडवा लाकडी खांब ठेउन त्यावर कप्पी लावून विहिरीतील पाणी वर ओढता येत असे . आजही आपल्याला बुरुजाच्या बाहेर आलेले खांब पाहायला मिळतात.


खंदकातील प्रवेशव्दारापाशी दोन बुरुजात लपवलेले प्रवेशद्वार आहे . प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत . पुढे गेल्यावर किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठा बुरुज बांधलेला दिसतो. या बुरुजावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. अशा प्रकारचा किल्ल्यात असलेला सुटा बुरुज भूईकोट किल्ल्यात पाहायला मिळतो. या बुरुजाचा उपयोग किल्ल्यात सर्व ठिकाणी तसेच किल्ल्याच्या बाहेर लक्ष ठेवण्यासाठी होतो. यशवंतगड हा किल्ला दोन भागात विभागलेला आहे. एक भाग पठारावर आणि दुसरा पडकोटाचा भाग खाडी पर्यंत पसरलेला आहे .बुरुज पाहून खाली उतरुन समोरच्या तटबंदीवर चढून झेंडा लावलेल्या बुरुजावर जाता येते . झेंडा बुरुज पाहून खाली उतरल्यावर दोन कोठारे आणि एक विहिर आहे . हे सर्व पाहून परत सुट्या बुरुजापाशी येउन बुरुज उजव्या बाजूला ठेउन झाडीतून खाली उतरल्यावर पडकोटाचा दरवाजा दिसतो. हा दरवाजा आजही शाबूत आहे. या दरवाजावर गणपती आणि कमळफुले कोरलेली आहेत. पडकोटात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला असल्येल्या तटबंदी पर्यंत जावे. ही तटबंदी पठारावर पसरलेली असून त्याच्या बाहेरच्या बाजूस खंदक आहे. तटबंदी जेथे संपते त्याठिकाणी बुरुज आहेत. बुरुजांपासून तटबंदी खाली उतरत थेट खाडी पर्यंत उतरलेली आहे . पडकोटात आमराई आणि दाट झाडी माजल्याने आमराईतून खाडीपर्यंत उतरणाऱ्या पायऱ्याच्या मार्गाने खाली उतरावे . याठिकाणी एक विहीर आहे . विहिरीच्या बाजूने खाडीवरील तटबंदीवर जावे . या ठिकाणी आल्यावर आपल्याला किल्ला या जागी का बांधला त्याचे प्रयोजन कळते.समोर एक विहीर आहे.
गडावर राहण्याची सोय नाही.